तेव्हा यरूशलेमाहून काही परूशी व नियमशास्त्राचे शिक्षक येशूकडे आले व म्हणाले,
“तुमचे शिष्य पूर्वजांनी घालून दिलेले नियम का पाळत नाहीत? कारण तुमचे शिष्य जेवणापूर्वी हात धूत नाहीत.
येशूने उत्तर दिले, “आणि तुम्ही तुमच्या परंपरा चालविण्यासाठी देवाची आज्ञा का मोडता?
कारण देवाने सांगितले आहे की, तुझ्या आईवडिलांचा मान राखआणि जो कोणी आपल्या आईवडिलांबद्दल वाईट बोलतो, त्याला जिवे मारावे.
पण तुम्ही म्हणता, जो कोणी पित्याला किंवा आईला म्हणेल की, तुला जे काही दिल्याने तुझा जो फायदा झाला असता, ते मी देवाला अर्पण केले आहे
ते देवाचे नियम मोडीत आहेत. आपल्या वडिलांचा व आईचा सन्मान करू नये. याप्रकारे तुम्ही आपल्या अशा परंपरेने देवाचे वचन रद्द केले आहे.
अहो ढोंग्यानो, तुम्हांविषयी यशया संदेष्ट्यांने योग्य सांगितले आहे. तो म्हणतो.
हे लोक, ओठांनी माझा सन्मान करतात पण त्यांचे ह्रदय माझ्यापासून दूर आहे.
आणि ते माणसाचे नियम आपली धर्मतत्त्वे म्हणून शिकवितात आणि व्यर्थच माझी उपासना करतात.”‘ यशया 29:13
तेव्हा लोकांना जवळ बोलावून त्याने म्हटले, ऐका व समजून घ्या.
जे तोंडाद्वारे आत जाते ते माणसाला अशुद्ध करीत नाही, पण जे तोंडातून बाहेर निघते तेच माणसाला अशुद्ध करते.”
नंतर शिष्य जवळ येऊन त्याला म्हणाले, परूश्यांनी जेव्हा हे ऐकले तेव्हा ते रागावले हे आपणांला कळते काय?
पण त्याने उत्तर देऊन म्हटले, प्रत्येक रोपटे जे माझ्या स्वर्गातील पित्याने लावले नाही ते उपटले जाईल.
त्यांना जाऊ द्या. ते आंधळे वाटाडे आहेत. जर एका आंधळ्याने दुसऱ्या आंधळ्याला वाट दाखवण्याचा प्रयत्न केला तर दोघेही खड्ड्यात पडतील.”
पेत्र म्हणाला, “आमच्यासाठी या बोधकथचे स्पष्टीकरण करा.”
“तुम्ही अजूनही बुद्धिमंदच आहेत काय?” येशूने त्यांना विचारले.
“जे काही तोंडात जाते ते सर्व पोटात जाते व मग बाहेर टाकले जाते. हे तुम्हांला अजून समजत नाही काय?
परंतु ज्या गोष्टी तोंडातून बाहेर निघतात त्या अंत:करणातून येतात व त्याच माणसाला डागाळतात.
कारण वाईट विचार, खून, व्यभिचार, जारकर्मे, खोट्या साक्षी, निंदा ही अंत:करणातून बाहेर निघतात.
माणसाला डागाळणाऱ्या याच गोष्टी आहेत न धुतलेल्या हाताने खाण्याने माणसाला विटाळ होत नाही.”
नंतर येशू तेथून निघून सोर व सिदोन चा भागात गेला.
तेव्हा एक कनानी स्त्री त्या भागातून येशूकडे आली. ती स्त्री ओरडून म्हणाली, “प्रभु, दाविदाच्या पुत्रा, माझ्यावर दया करा. माझी मुलगी भुताने पछाडली आहे.”
पण येशूने तिला एका शब्दानेही उत्तर दिले नाही, तेव्हा त्याच्या शिष्यांनी येऊन त्याला विनंति केली, “तिला पाठवून द्या, कारण ती आमच्या मागे ओरडत येत आहे.”
पण येशूने उत्तर दिले, “मला देवाने फक्त इस्राएलाच्या हरवलेल्या मेढरांकडे पाठविले आहे.”
मग ती स्त्री पुन्हा येशूकडे आली, ती येशूच्या पाया पडली व म्हणाली, “प्रभु, माझे साहाय्य करा.
परंतु त्याने म्हटले, “मुलाची भाकर घेऊन कुत्र्यास टाकणे बरे नाही.”
ती स्त्री म्हणाली, “होय प्रभु, परंतु कुत्रीही आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेले उष्टे चूर खातात.
तेव्हा येशूने तिला म्हटले, “बाई, तुझा विश्वास मोठा आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे तुला होवो.” आणी तिची मुलगी बरी झाली.
नंतर येशू तेथून निघुन गालील सरोवराकडे गेला. येशू डोंगरावर गेला आणि तेथे बसला.
मग पुष्कळ लोक त्याच्याकडे आले, त्यांनी आपल्याबरोबर लुळे, पांगळे, आंधळे, बहिरे व इतर अनेक लोकांना आणले होते आणि त्यांनी त्या आजाऱ्यांना येशूच्या पायावर ठेवले. तेव्हा त्याने त्यांना बरे केले.
मुके बोलू लागले, लुळे सशक्त झाले. व्यंग असलेले चांगले झाले, लंगडे चालू लागले, आंधळे पाहू लागले. हे पाहून लोक थक्क झाले, आणि त्यांनी इस्राएलाच्या देवाचा गौरव केले.
मग येशूने आपल्या शिष्यांस आपल्याजवळ बोलावून म्हटले, “मला लोकांचा कळवळा येतो. कारण ते आज तीन दिवस झाले माझ्याजवळ राहिले आहेत आणि त्यांच्याकडे खायला काही नाही, आणि त्यांना उपाशी पाठवावे अशी माझी इच्छा नाही. कारण ते वाटेत कदाचित मूर्च्छित होतील.”
शिष्य त्याला म्हणाले, “एवढ्या मोठ्या लोकसमुदायाला तृप्त करावे इतक्या भाकरी ह्या दूर रानात आमच्याजवळ कोठून असणार?”
तेव्हा येशू म्हाणाला, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” ते म्हणाले, “आमच्याकडे सात भाकरी आहेत व काही मासे आहेत.”
मग त्याने लोकांना जमिनीवर बसविण्याची आज्ञा केली.
मग त्या सात भाकरी व मासे घेऊन त्याने देवाचे उपकार मानले व त्या भाकरी मोडल्या व शिष्यांना दिल्या व शिष्यांनी लोकांना दिल्या.
तेव्हा ते सर्व जेवून तृप्त झाले आणि त्यांनी उरलेल्या तुकड्यांनी भरलेल्या सात पाट्या गोळा केल्या.
आणि जेवणारे, स्त्रिया व लेकरे सोडून चार हजार पुरूष होते.
मग समुदायास निरोप दिल्यावर तो नावेत बसून मगदानाच्या हद्दीत गेला.